बा भीमा तुला वाचताना, समजून घेताना…


अपूर्व कुरूडगीकर

जसजसं वय वाढत गेलं, तसतसं तुला समजायला लागलो. तुझा जीवनपटच इतका रोमांचक होता आणि तो मी कित्येकदा वाचला हे मला सुद्धा आठवत नाही, आणि कोणाकोणाचा वाचला हे सुद्धा ! तुझ्या जीवनपटातील एक किस्सा त्यात असं वाचलं की तू पुस्तकांसाठी घर तयार केलं आणि जगात सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी, पुस्तकांचा साठा तुझ्याकडे होता. हे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी बाब होती. जातिव्यवस्थेची जातीव्यवस्थेचे चटके अजून तरी मला त्या वेळेस मिळाले नव्हते, त्यामुळे तुझं कार्य तितक आपलंस वाटलं नसेल. खरं सांगायचं म्हणजे तुझे पुस्तक वाचताना मला कंटाळा यायचा म्हणून मी इतर पुस्तके वाचयला चालू केल छावा वाचलं, पानिपत, नेपोलियन, युगंधर, मृत्युंजय, स्टीव जॉब्स हे पुस्तक वाचताना मी सातवीत होतो, शाळेमध्ये लायब्ररी नवीनच उघडली होती आणि ग्रंथपाल संतोष सर नोंद न करता मला पुस्तके वाचायला द्यायची मुळांमध्ये हे पुस्तक वाचण्याची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हतीच, (हे पुस्तक सिल्याबस बाहेरची होती म्हणून) पण या पुस्तकांच्या वाचनामुळे वाचनाचा छंद मात्र लागला म्हणजे कंटाळा येणं बंद झालं,

पुस्तकाबद्दल चे प्रेम हे केवळ तुझे जीवनचरित्र वाचल्यामुळेच झाले हे मला ठाऊक आहे. तू परदेशातून वापस येताना पहिले महायुद्ध सुरू होतं आणि त्यावेळेस तू येणार होतास. बारूदाचा हमला होऊन ते जहाज बुडाले नंतर समजलं की तू त्या जहाजात नव्हतास तर तुझे पुस्तके होती. पुस्तके बुडाली म्हणून हुंदके देत रडत होता. हे जेव्हा वाचल, त्यावेळेस तुझे पुस्तकांवर चे प्रेम अधिक स्पष्टपणे समजू शकलो. आणि मी सुद्धा पुस्तके वाचून जमा करण्यास सुरुवात केली, आज 3500+ जवळपास पुस्तके माझ्याजवळ उपलब्ध आहेत. त्यातली खूप पुस्तके आजोबांची आहेत आणि ती वाचायची राहिली आहेत.

मी तुझ्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट पाहत होतो त्यात एका प्रसंगात तुला एक व्यक्ती विचारतो की तुम्ही बायबल वाचली आहेत का ? त्यावर तू त्याला, “Imperial Bible, Baroque Bible, Kennicott Bible, Victorian Bible, Alexandra Bible…” यावर त्या इंग्लिश पत्रकाराचे चित्रपटातील हावभाव बघून मला हस्ने आले. पण हा प्रसंग जेव्हा खरोखर घडला असेल त्यावेळेस त्या इंग्लिश पत्रकाराचे हावभाव नक्कीच डोळ्यात साठवण्या सारखे असतील आणि तू ते पाहिले ही असेल. यावरून समजतो की तू केवळ सामाजिक अभ्यास न करता इतर धर्मातील धार्मिक ग्रंथाचे तुझं वाचन हे अफाट होतं, आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ वाचण्यासाठी प्रेरित करेल.

खरं सांगायचं तर, तू लिहिलेले वाचण्यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरी घेऊन मी खूप दा बसलोय मुळात मी ते सोबतच ठेवतो, आणि तु लिहिलेलं वाचन करणे म्हणजे मला चालेंज वाटतं ! प्रत्येक वाचकांसाठी तुझे संदर्भ आणि प्रसंगानुसार तुला कुठे काय म्हणायचं हे समजणे तर वाचण्या पेक्षा अधिक अवघड आहे, म्हणून कदाचित तुला वाचण्याचा मला आधी कंटाळा येत असेल हे मला अलीकडच्या काळात समजलं. असो पण मी आता कंटाळा करत नाही..

अजून तरी मी अन्याय/जातीय भेदभाव अनुभवला नव्हता, पण हातामध्ये पुस्तके पडली, “आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ” खंड चौथा 72 चा काळ, पॅंथर चा काळ ! पॅंथर ज वि पवार, नामदेव ढसाळ आणि एस एम प्रधान यांचे कार्य वाचन जिथे अन्याय तिथे पॅंथर, आपल्यावर किती अन्याय होत होता, होत आहे, याची जाणीव आता होत होती. आणि आठवते त्यावेळेसच लिहिण्यास सुरुवात केली, संघटनेत सक्रिय सहभाग नोंदविला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्दे त्याचा अभ्यास, त्यावर मोर्चे, त्यावर लिखाण सुरू केलं. त्यावेळेस समाजाचा खरा चेहरा समोर आला. इथे तुझा नावासाठी ही संघर्ष आहे हे समजायला वेळ लागला नाही. या समाजासाठी ( जात नाही, तर पूर्ण राष्ट्र) तू केलेले कार्य डोळ्यासमोर फ्लॅशबॅक सारखे सतत येत होते. तू त्यांच्यासाठी दिवस-रात्र एक केलं तरीही ते तुला आपलं का मानत नाहीत हा प्रश्न आजही तितकाच सतावतो पण थोडं समाधान आहे आता कारण त्याचेही कारण मला काही प्रमाणात मिळालीत, तसंही तू “Annihilation Of Caste” मध्ये तू म्हटले आहे,” स्वजातीतला नेता स्वजातीच्या लोकांना प्रिय असतो आणि ते लोक त्याच्याशी प्रामाणिक हि असतात, जसं ब्राह्मणांना ब्राह्मणांचा नेताच हवा असतो, तसेच कायस्थ लोकांना कायस्थच नेता हवा असतो.” हे ही एक कारण असू शकत.

तुझं कार्य सर्वसामान्यांपर्यंत अजून पोहोचलाच नाही खरं तर ते पोहोचवण्याची जिम्मेवारी आमचीच आहे. उर्जा क्षेत्रातील तुझं काम आजही लुप्त आहे, तू इंजिनियर कधी बनवलास हे तुझ्या जीवन चरित्र मी वाचलाच नव्हता, तू धर्माची निर्मिती केलेस हे आम्हाला आत्ता कुठे समजायला, वाचायला मिळत आहे. औद्योगिक क्षेत्रात तुझं कार्य, देशाचा लोकसंख्येवर तू मांडलेले मुद्दे “फॅमिली प्लॅनिंग”, यावर तो म्हटलं होत “जर देशाची लोकसंख्या नियंत्रित करता आली नाही, तर देशात बेरोजगारी भूकमारी वाढेल.” आजचे देशाचे चित्र हे तुझ्या शब्दांना तंतोतंत जुळतं ही तुझी दूरदृष्टी होती, तू या राष्ट्राला प्रत्येक आपत्ती साठी अगवा केलस, पण त्यांनी यावर पावले निर्बंध उचलली नाही. त्याचेच परिणाम आज हे राष्ट्र भोगत आहे, रोजगार नसल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढता आहे व त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही..

तुझ्या महिलांचा महिलांसाठी चे कार्य, कामगारांसाठी चे कार्य, तुझे विचारधारा कम्युनिस्ट नव्हती तुला ते विचार पटतही नव्हती तरीही तु कामगाराचा एक दिग्गज नेता ठरलास, खाणीत काम करणाऱ्या कामगारांचा तु माय बाप झालास. प्रसूतीच्या काळात महिलांना पगारे सुट्टी, वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार, डीवोस आणि आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार देऊन तु सर्वात मोठा फेमिनिस्ट ठरलास, तुझे हे कार्य आजही भारतातील 88 ते 85 टक्के महिलांना माहिती ही नाही, ते या सर्व सुख सुविधा चा वापर करतात पण त्यांना हा प्रश्न कधी पडत नाही, या सुख-सुविधा आपल्याला का मिळतात ? असो हा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न !

तू केलेले कित्येक कार्य तत्कालीन काँग्रेस मधल्या नेत्यांनी आपल्या नावावर खपवली, शब्द चुकीचा घरी असला तरी सत्यता हीच आहे बरं ! आणि तू एकदाही त्यांना विरोध केला नाही, तुझं मन फार उदार होतं एका महासागरा सारख. तो संविधान सभेत “हिंदू कोड बिल”चा प्रस्ताव ठेवला होता मी वाचले पूर्ण संविधान सभा तुझ्या विरोधात एक तर्फा झाली होती. नंतर ते बिल पास झालं आणि भारतातील प्रत्येक स्त्रियांना हक्क आणि अधिकार बहाल झाले.

तुझं जीवन एक रोमांचक कथा आहे, तुझ्या संविधान सभेत निवडून जाण, तुला रोखण्यासाठी काँग्रेसच्या त्या दिग्गज नेत्यांनी केलेला प्रयत्न आणि तुला संविधान सभेत घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनीच केला प्रयत्न ! त्यानंतर तु संविधान सभेत मांडलेल्या भूमिका, तुझे भाषणे आजही पुन्हा पुन्हा वाचताना तु ज्या ताकदीनिशी संदर्भ देत होतास हे केवळ तुझ्या वाचनामुळे अभ्यासामुळे, हे सर्व तू केवळ अन केवळ, आमच्या साठी केलं हे ही माहिती आहे मला.

तसं तुझे कार्य आणि त्याची महती या छोट्याशा लेखांमध्ये सामावणारी नाही पण तुझ्या एका लेकाचा एक भोळा भाबडा प्रयत्न समज, अजून तुला खूप वाचायचं, तुला समजायचं तू इतरांपेक्षा थोडा किचकट आहेस. पण शेवटी जे आहेस ते सर्व तूच आहेस.. लहानपणापासून तुझ्या जीवनातील एक-एक भाग समजत गेलो, फक्त हे आयुष्य तुला समजण्यात पूर्ण व्हावे एवढीच अपेक्षा या आयुष्याकडून आहे. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या कोट्यावधी आंबेडकरी जनतेतला मी पण एक आहे. तुझ्यावर एका प्रियकरा सारखा प्रेम करणारा व वडिलांसारखा आदर करणारा..

नानक चंद रतूच्या तोंडून तुला ऐकालकी अंगावर शहारे येतात म्हणे, रतू नेहमी तुझी काळजी घ्यायचे, त्यांनी खऱ्या अर्थाने मी तुला जगल, तुला अनुभवलं खरंच ! त्यांची ओळख माझा मुंबईचा आजोबांना होती, त्यांच्याबद्दल ते नेहमी सांगायचे आणि खरंतर रतू तुझ्यासोबत घडलेली किसे त्यांना सांगायचे आणि ते आमच्या घरच्यांना, माझ्या आजोबांनी तुझ्या जीवनात खूप किस्से सांगितलेत जे कोणत्याही पुस्तकात उपलब्ध नाहीत आणि मुंबईच्या आजोबांनी खरंतर त्यांच्या ओळखीमुळे आणि माझे आजोबा च्या सामाजिक कार्यामुळे मी खूप लहान असताना, घरी नानकचंद रतू आलेले आणि तुझा स्वयंपाक्या पण ज्या हातांनी तुला दिवस रात्रभर जपलं, तु वाचताना तुला पाणी आणून दिलं, तु झोपताना तुला पांघरल, जेवताना तुला एक भाकरीचा तुकडा पुन्हा आणून दिला, तुला भात वाढलं, तुला गोळ्या दिल्या आणि तू बोललेलं टाईपराईटर वर लिहून तुला दिला त्या हातांनी मला उचलून घेतलं आणि खरंच, मी स्वतः स्वतःवर थोडा गर्व बाळगायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं.

तु काय आहेस ! हे मला शब्दात पूर्णविरामा सारखं कधी मांडता येणार नाही, पण मी नेहमी तुला सेमीकोलोन देऊन लिहित राहील, हे सर्व जे आहे, ते सर्व तुझेच आहे. बा माझे जगणे आणि माझे मरण सुद्धा…बा भीमा!

अपूर्व कुरूडगीकर

लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून IT क्षेत्रात कार्यरत आहेत, तसेच ते Panther Talks चे संपादक आहेत.

2 Comments

Leave a Reply to APURV KURUDGIKAR Cancel reply

Your email address will not be published.


*