
डॉ. रत्ना पानवेकर
वादळ होवून या धरतीवर तू गरजला जेव्हा,
मृत धरतीला खरा अंकुरच फुटला तेव्हा,
तू प्रज्ञासुर्य, तुझ्या प्रज्ञेने समाजाला प्रेरीत करून गेला म्हणूनच भिमा आमच्या तना मनात
फक्त तूच वसलेला!!
तू सोसलेस विषमतेचे दाहक चटके,
आणि जातीयतेचे विषारी फटके,
पण तू खंबीर, स्थिर सुर्यासारखा,
आम्हा प्रकाशमान करून गेला
म्हणूनच भिमा आमच्या तना मनात
फक्त तूच वसलेला!!
समाज परिवर्तनाच्या ज्वालेने तू अंतर्बाह्य पेटला,
तुझ्यातील ध्येयाचा अग्नी, संकटे आली जरी, तरी नाही विझला,
जीवनमूल्यांचे धडे तू आम्हा देवून गेला,
म्हणूनच भिमा आमच्या तना मनात
फक्त तूच वसलेला!!
तुझी लढाई होती शोषितांसाठी,
सामाजिक न्याय, समता व मानवतेची,
तू सामाजिक न्यायाचा समर्थक ,
समस्त भारतीयांना समतारूपी संविधान देवून गेला,
म्हणूनच भिमा आमच्या तना मनात
फक्त तूच वसलेला!!
अंधश्रद्धा, रूढी, परंपरेच्या जाचात,
अडकलो होतो आम्ही वर्षानुवर्षे ,
तू महामानव, बोधिसत्व, आमच्या उत्थानासाठी बुध्दाचा धम्म देवून गेला.
म्हणूनच भिमा आमच्या तना मनात
फक्त तूच वसलेला!!
~~~
डॉ. रत्ना पानवेकर: पीएचडी (भौतिकशास्त्र), हया एमएच साबू सिद्धिक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई येथे भौतिकशास्त्रातील सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिकवण्याव्यतिरिक्त त्या लेख, गाणी आणि कविता सुध्दा लिहितात.

Leave a Reply