आभाळा एवढा माणूस; छत्रपती शाहू महाराज!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

०६ मे २०२२ रोजी राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृती शताब्दी वर्षे आहे त्यानिमित्ताने त्यांच्या ऐतिहासिक कार्याकडे पाहताना.

भारतातील ६६४ संस्थांनापैकी केवळ बोटावर मोजता येणारी काही संस्थाने होती ज्यांनी ऐषआरामाचे जीवन जगण्यापेक्षा, भौतिक सुखाचा उपभोग घेण्यापेक्षा, आपल्या सत्तेचा व अधिकाराचा शोषित पीडित समाजाच्या कल्याणासाठी उपयोग केला.

त्यामध्ये एक करवीर अर्थात कोल्हापूरचे संस्थान, दोन – बडोदा संस्थान, तीन – इंदौर संस्थान, अशा संस्थानाचा उल्लेख करता येईल. यांपैकी बडोदा संस्थानचे संस्थानिक होते बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड व कोल्हापूर अर्थात करवीर संस्थानाचे होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच इंदौर संस्थानचे संस्थानिक होते राजे मल्हारराव होळकर.

राजर्षी शाहू महाराज म्हणजे फुले -आंबेडकरांना जोडणारा दुवा होय.

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ साली झाला. त्यांच्या आई राधाबाई या मुधोळच्या राजकन्या होत्या. तर वडील जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे हे कागलचे होते.

त्यांचे दत्तक पिता -४ थे शिवाजी होते, तर त्यांची दत्तक माता – आनंदीबाई होत्या.

१७ मार्च १८८४ साली वयाचा १० व्या वर्षी ‘ शाहू छत्रपती (राजा) महाराज’ यानावाने करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज १८९४ ते १९२२ असे २८ वर्षे राज्यकारभार केला.

या राज्यकारभाराच्या वेळेस छत्रपती शाहू महाराज यांना खूप कटू अनुभव आले.

नोव्हेंबर १८९९ साली छत्रपती शाहू महाराज यांना जातियव्यवस्थेने सामोरे जावे लागले. पंचगंगा येथे स्नान करते वेळी त्यांना शूद्र म्हणून नारायण भट (ब्राह्मण) पुरोहित यांनी छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्र ऐवजी पुराणोक्त मंत्राचा उच्चार करत होता.

१) वेदोक्त मंत्र पवित्र असतात, शुभ, मंगल आणि केवळ ब्राह्मणासाठी असतात.

२) पुराणोक्त मंत्र हे अशुभ, अपवित्र, अमंगल असतात आणि ते केवळ शूद्रांसाठी असतात.

जेव्हा हे प्रकरण शाहु महाराज यांचया सोबत घडल्यामुळे त्यांना प्रचंड धक्का बसला आणि विचार मनात आला की मी छत्रपती असून मला शूद्र ठरवून ब्राह्मणी केवळ माझाच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा मोठा अपमान केला आहे आणि, माझ्या बहुजन समाजातील लोकांना किती त्रास होत असावा.

तेव्हा पासून शाहु महाराज यांनी ठरविले की यापुढे ब्राह्मणांच्या हातून कोणतेही धार्मिक कार्य विधी करायचा नाही.

२६ जुलै १९०२ साली (Implementation Of Reservation) भारताच्या आधुनिक काळात सर्वांत प्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात लागू केले.

राजर्षी शाहू महाराज यांनी जे ५०% टक्के आरक्षण घोषित केले त्यातून केवळ चारच जाती वगळल्या.

१) ब्राह्मण
२) शेणवी
३) प्रभू
४) पारशी या चार पुढारलेल्या जाती सोडून बाकी सर्व जातींना बहुजन समाजाला आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व घोषित केले.

महाराजांनी अगोदर पाहणी केली आणि पाहणीत त्यांच्या लक्षात आले की, सरकारी दरबारी ७१ पैकी ६० ब्राह्मण उच्च पदावर नोकऱ्यावर होते, व ११ बहुजन होते. तसेच खाजगीत ५२ पैकी ४५ ब्राह्मण नोकरीत होते व ७ बहुजन वर्गातील होते. हा प्रशासनातील असमतोल दूर करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व बहुजन समाजाला ५०% आरक्षण घोषणा केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी क्रांतिकारी निर्णयाला पुढील लोकांनी कडाडून विरोध केला. त्यामध्ये

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, (न्यायमूर्तीच सामाजिक न्यायाला विरोध करीत होते. रघुनाथ व्यंकाजी सबनीस, गोपाळ कृष्ण गोखले, शि. म. परांजपे, नरहरी चिंतामण केळकर, दादासाहेब खापर्डे, बाळ गंगाधर टिळक आणि अँड. गणपतराव अभ्यंकर यांचा समावेश आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांमध्ये सर्वांच्या सर्व ब्राह्मण होते.

आजही त्यांच्या मानसिकतेमध्ये फरक पडलेला नाही.

जेव्हा छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यात प्रथम आरक्षण लागू केले तेव्हा, बाळ गंगाधर टिळक नावाच्या व्यक्तीने विरोध केला?

“तेली तांबोळी आणि कुणबट्यानी (कुणबी ही जात आहे, कुणबट्यानी हे त्वेषाने बोलणे आहे) संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे का!”

म्हणजे तत्कालीन जे कोणी ब्राह्मण होते त्यांना छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या आरक्षणाला नुसता विरोध नव्हता तर, द्वेष होता त्वेष होता.

१४ फेब्रुवारी १९१८ साली टिळक अथणी (महाराष्ट्र-बेळगावच्या मध्ये) येथे जाहीर सभेत बोलले, “तेली तांबोळी आणि कुणबट्यानी (कुणबी ही जात आहे, कुणबट्यानी म्हणजे त्वेषाने बोललेले) संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे का!” नंतर पुन्हा टिळकांनी पंढरपूर येथे सुद्धा जाहीर सभा घेऊन आरक्षणाला कडाडून विरोध केला. त्याच सभेमध्ये समोरच एक व्यक्ती बसलेले होते टिळकांनी त्यांना पाचारण केले बोलण्यासाठी, ते व्यक्ती स्टेजवर आले आणि बोलायला सुरुवात केली, काय बोलले ते व्यक्ती, टिळक महाराज म्या काय बोलणार, आमी काय धोबी, परीट वर्षानुवर्षे आमी तुमच्या लोकांचे कपडे धुणे करतो, तुम्ही आता बोलतात, “तेली तांबोळी आणि कुणबट्यानी संसदेत जाऊन काय नांगर हाकायचे आहे का!” मग एक काम करा आमच्या सर्वांना तुमी बामण बनवा म्हणजे सगळेच संसदेमध्ये जातील.

त्या व्यक्तीचे नाव आहे संत गाडगे महाराज होय. ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यात आरक्षणाची तरतूद केली तेव्हा तत्कालीन धर्ममार्तंड कर्मठ लोकांनी विरोध केलाच होता, त्याचा काही इतिहास आहे ती सांगणे मला इथे योग्य वाटतं,

सांगली मधील पटवर्धन नावाचे संस्थानिक होते त्यांनी त्यांच्या संस्थेमधील वकील गणपतराव अभ्यंकर यांना कोल्हापूर येथे पाठविले, अभ्यंकर कोल्हापूरला आले आणि छत्रपती शाहू महाराज यांना भेटले, शाहू महाराज आले तेव्हा अभ्यंकर यांना विचारले की काय झाले, अभ्यंकर बोलले की, “तुम्ही आरक्षण चालू केले आहे त्यामुळे तुम्ही आमच्यावर अन्याय केला आहे? आरक्षण तुम्ही लायकी बघून द्यावे जो लायकीचा नसेल त्याला आरक्षण देऊ नये.” असे पटवर्धन यांनी तुम्हाला सांगण्यासाठी मला पाठविले आहे.

सर्व ऐकून झाल्यावर छत्रपती शाहू महाराज यांनी वकील अभ्यंकर यांना घोड्याच्या तबेल्यात घेऊन गेले, त्यांच्या सेवकाला सांगितले की प्रत्येक घोड्याला बाहेर काढा, समोरच्या मैदानावर एक चटई टाका आणि त्यामध्ये हरभरे (चणे) सर्व टाकून द्या, हे सर्व वकील अभ्यंकर बघत होते पण त्यांना काहीच कळत नव्हते.

त्यानंतर सर्व घोडे आले चणे खाण्यासाठी, आणि घोडे एकमेकांवर तुटून पडलेले आहेत, चणे खाण्यासाठी आणि विशेष बाब म्हणजे त्यामध्ये काही घोडे सशक्त होते, आणि काही घोडे कमजोर होते.

जे कमजोर होते ते चणे खाण्यासाठी प्रयत्न करत होते पण, जे सशक्त घोडे होते ते त्यांना खाऊन देत नव्हते.

पण कमजोर घोडे, सशक्त घोड्यांचे लाता खात होते.

हे सर्व अभ्यंकर पाहत असताना त्यांना काहीच कळत नव्हते, यावर छत्रपती शाहू महाराज बोलले की, पाहिलेत का अभ्यंकर जे सशक्त घोडे आहेत, ते कमजोर घोड्याना चणे खाऊन देत नाही, हे असेच होणार आहे म्हणून मी प्रत्येक घोड्याचा खाण्याचा वाटा त्यांच्या तोंडाजवळच ठेवले आहे, कारण ते इतर कोणाचा वाटा खाणार नाहीत.

एवढे बोलल्यावर अभ्यंकर चिडीचूप झाले.
शाहू महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे बोलले अभ्यंकर, जाती जनावऱ्यामध्ये असतात, माणसात नाही!
परंतु तुम्ही (ब्राह्मणानी) लोकांनी माणसामध्ये जाती निर्माण करून त्यांना जनावऱ्यासारखी वागवणूक देत आहात
म्हणून मी माझ्या राज्यात बहुजन वर्गाला आरक्षणाची तरतूद करून ठेवली आहे.
यावर अभ्यंकर यांना सगळे काही समजले की छत्रपती शाहू महाराज काय सांगत होते, अभ्यंकरांनी तिथून काढतापाय काढला.

(छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध..)

छत्रपती शाहू महाराज यांना जेव्हा माहिती झाले की केवळ महार जातीतून नव्हे तर संपूर्ण अस्पृश्य वर्गातून उच्च शिक्षण घेणारे डॉ. भीमराव आंबेडकर आहेत.

१९२० साली जेव्हा माणगाव येथे परिषद झाली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी जाहीरपणे समाजाला सांगितले की, मला खात्री पटलेली आहे, तुमचा उद्धार डॉ. भीमराव आंबेडकर हेच करणार आहे आणि एक दिवस संपूर्ण देशाचे ते नेते होतील यात काही शंका नाही. पाक्षिक मूकनायक मराठी भाषेतील अंक काढण्यासाठी एक वेळ नाही तर अनेक वेळा सहकार्य केलेले आहेत हे आपल्याला छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये झालेले पत्रव्यवहारामधून दिसून येत आहे.

पत्रांची सुरुवात खुद्द छत्रपती शाहू महाराजांनी केलेली होती, सन सप्टेंबर १९१९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी, पत्रांची सुरुवात (लोकमान्य आंबेडकर यांसी, सप्रेम प्रेमाची वृद्धी असावी ही विनंती विशेष) एवढे मोठे राजे आणि डॉ. आंबेडकरांना लोकमान्य यानावाने सुरुवात करावी हे समाजातील लोकांपर्यंत अद्याप आलेले नाही.

दिनांक २१ जून १९२० साली छत्रपती शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खूपच महत्त्वाचे पत्र लिहिले.

त्यात म्हणतात, टिळकांनी महारांना गुन्हेगार असे वर्णन केलेले आहे, याबद्दल त्यांच्या विरोधात कोर्टात गुन्हा दाखल करावा? आणि त्यांचा राजकीय पक्ष लोकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा योग्य वापर केला जात नाही? हिशोबामध्ये मोठी आर्थिक फसवणूक झालेली दिसून येत आहे, या हिशोबाच्या आधारे यांच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी किंवा दोन्हीही प्रकारच्या केसेस दाखल कराव्यात काय?

पुढे एक अस्पृश्याच्या चळवळीबद्दल अत्यंत महत्त्वाचे पत्रव्यवहार आहे..

मॉँटेग्यु यांच्या संदर्भातील घडामोडींबाबत डॉ. बी आर आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९२० साली रोजी शाहू महाराजांना लंडन येथून पत्र पाठविले होते. शाहू महाराजांच्या सूचनेवरून डॉ. आंबेडकर यांनी मॉँटेग्यु यांची भेट घेतली आणि भारतातील ब्राह्मणेतर चळवळीची बाजू त्यांच्या समोर मांडली आणि या चळवळी विषयी त्यांची सहानुभूती मिळवली होती. आणि पुढे त्यांनी मुंबई येथील गव्हर्नर यांना तार करून पाठविले की, त्यात लिहिलेले होते अस्पृश्य वर्गाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळवून द्यावे.

छत्रपती शाहू महाराज हे खूप मोठे द्रष्टे नेते होते त्यांना माहिती होते की अस्पृश्य वर्गाला आपल्याला इतर उच्च जातीच्या बरोबरीने आणायचे आहे. त्यासाठी त्यांनी डॉ. आंबेडकरांची निवड केली, आणि डॉ. आंबेडकरांनी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचे वचन मोडू दिले नाही.

एक महत्त्वाची घटना आपल्या समोर सांगणे योग्य होईल.

१६ फेब्रुवारी १९२२ साली दिल्ली येथे झालेल्या वंचित वर्गाच्या तिसऱ्या अखिल भारतीय परिषदेत शाहू महाराजांनी केलेल्या भाषणाचा काही सारांश.

“…रक्तरंजित क्रांती नव्हे तर शांततामय मार्गानेच होणारी करणारी हाच प्रगती आणि समृद्धीचा मार्ग आहे हे या २० व्या शतकात जगन्मान्य झालेले तत्व आहे. वॉशिंग्टन आणि जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय परिषदा म्हणजे याच तत्वाचे प्रकटीकरण होय. आपण देखील याच तत्वाचा स्वीकार करून त्याचे अनुसरन करूया.

The Great Leader असे बोलून, महाराज पुढे म्हणतात तुम्ही सर्वांनी तुमचा खरा नेता म्हणून डॉ. भीमराव आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवावा आणि त्यांच्यासारखे होण्यासाठी त्यांच्या सारखे वागण्याचा प्रयत्न करावा.

शेवटी दिनांक ६ मे १९२२ साली छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबई येथील पन्हाळा लॉज मध्ये अकस्मात निधन झाले. ही वार्ता संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली. अस्पृश्यांचा मोठा आधारवड गेला कोणालाच विश्वास बसेना. अवघ्या ४८ व्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निधन होते? ही चिंतनीय बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा लंडन मध्ये होते आणि त्यांना जेव्हा पत्रातून कळले की छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हादरून गेले, मोठा आधार आपल्याला पासून निघून गेला. त्यांच्या जाण्याने समाजाचे खूपच नुकसान झालेले आहे. ती पोकळी कशी भरून काढणार.. त्यांच्या कडे शब्द नव्हते.

दिनांक १२ मे १९२२ रोजी मुंबई भायखळा येथुल क्लार्क रोड वरील, महार कॉलनीतील इम्प्रेव्हमेंट ट्रस्ट चाळीच्या रहिवाशांची ४००० लोकांची डिप्रेस्ड क्लासेसच्या वतीने पुण्याच्या श्री. आर एस निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेतली. आणि त्यात छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा बद्दल सांगितले. त्यांच्या जाण्याने अस्पृश्यांचा आधारवड गेल्याचे जाणीव होत आहे. छत्रपती शाहू महाराज अजून काही वर्षे जगले असते तर अस्पृश्य वर्गाचा आश्चर्यकारक उन्नती झाली असती. छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांना सदरील मीटिंगचे पत्र पाठवून भावना व्यक्त केला गेल्या.

छत्रपती शाहू महाराज यांचा अभ्यास प्रचंड होता, त्यांच्या शिक्षणाची डिग्री (G.C.S.I., G.C.I.E., G.C.V.O., LL.D.,) सुद्धा विदेशातील आहेत. म्हणजे त्यांचे शिक्षण हे उच्च स्तरावर होते दूरदृष्टी होती आणि म्हणूनच देशातील बहिष्कृत वर्गाचे नेतृत्व करण्यासाठी, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली.

आज लोकराजा लोकमान्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृती शताब्दी वर्षं निमित्ताने कोटी कोटी वंदन!!!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे

लेखक अधिवक्ता असून कवी तसेच सामजिक कार्यकर्ता आहेत व ठाणे शहर येथील रहिवासी आहेत.

5 Comments

  1. धन्यवाद,
    आपण माझा लेख आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध केल्याबद्दल. सामाजिक विचार परिवर्तन हेच आपले ध्येय आहे. अँड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ठाणे शहर 7045171114

  2. छान, प्रज्ञेश जी असेच लिहत रहा, आजच्या घडीला काही नेत्यांना फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र बोलले की राग येतो अश्या व्यक्तींनी फुले,शाहू आंबेडकर वाचणे आवश्यक आहे

  3. चांगले केले. बहुतेक घटनांचा समावेश आहे. असच चालू राहू दे.

  4. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 26 जुलै 1902 ला शाहुमहाराजांनी आरक्षण लागू केले आणि त्याला न्यायमूर्ती रानडे यांनी विरोध केला….. पण त्यांचे निधन तर 16 जानेवारी 1901 मधेच झाले होते दीड वर्ष आधी. मग त्यांचे भूत आले होते का शाहुमहाराजांना विरोध करायला? जी गोष्ट रानड्यांची तिच गोखल्यांची. रानडे आणि गोखले हे दोघेही पुरोगामी विचारांचे होते टिळकांनी आरक्षणाला विरोध केलं असेल पण गोखल्यांनी विरोध केल्याला काही पुरावा आहे का?

Leave a Reply to Nishad B Javir Cancel reply

Your email address will not be published.


*