घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भिमाचं नाव!!!

प्रतिक्षा भवरे

वाटले भीमाला लोकं शिकतील सवरतील, स्वतःसवे समाजाचा विकासही करतील…

26 जानेवारी 1950 ला संविधानाची अमलबजावणी झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला. पण प्रजासत्ताक दिन कोणामुळे..? तर
डॉ. बी. आर. आंबेडकरांमुळे..!

संविधान कोणामुळे….?

तर आपल्या बापामुळेच…

तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलय रं,
पुसणार नाही असच अक्षर भिमानं लिहिलय रं..!

लोकांनी, लोकांकरिता, लोकांसाठी बनविलेले राष्ट्र, बाबांनीच आपल्याला बहाल केले. ज्या देशात पाणी पिण्यालाही काही समूहाला मुभा नव्हती त्या देशात सर्व जण समानतेने रहायला लागले. बा भीमा तु प्रत्येक भारतातील नागरिकाला एकमताचा अधिकार दिलास आणि मताच्या आधारेच प्रजेची सत्ता निर्माण केली. “स्वातंत्र्यपूर्वी भारतात राजा हा राणीच्याच पोटातून जन्म घेत असे परंतु प्रजासत्ताक दिनापासून गणराज्य हे मताच्या पेटीतून जन्म घेते.!”

सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक आर्थिक व राजकिय न्याय, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता याची शिकवण देणारा हा प्रजासत्ताक दिन.

शाळेमध्ये, कार्यालयामध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले किंवा शिकविले जात नाही. फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेऊन मनोरंजन केले जाते. ही एक खेदजनक बाब आहे. हे सर्व लोकांना मान्य करावे लागेल.

२६ जानेवारी १९५० मध्ये कोणीही शहिद झालं नाही.उगाच त्यादिवशी शहिदांचे गाणे लावून लहान मुलांची दिशाभूल करू नये,त्यादिवशी भारतात संविधान लागू झालं होतं.

प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्यदिवस यातला फरक, नेमका अर्थ तरुणांना समजावून सांगावा..
संविधानाचे महत्व आणि संविधानाने दिलेलं अधिकार याचे प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे.

खरं तर 26 जानेवारी चे खरे महत्व काय..? तर…..

15 ऑगस्ट 1947 रोजी आपली मायभूमी ब्रिटिशांच्या राजवटीतुन मुक्त झाली. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले पण ते टिकून राहण्यासाठी संविधान सभेची घोषणा करण्यात आली आणि 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन झाली. त्या समितीमध्ये एकूण सात सदस्य होते. त्यापैकी एकाने लगेच राजीनामा दिला त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सदस्य मृत्यू पावला त्याचीही जागा रिकामीच राहिली. एक अमेरिकेत गेला त्याची सुद्धा जागा तशीच राहिली. एक सदस्य संस्थानिक कामात गुंतुन असल्यामुळे ते असून सुद्धा नसल्यासारखेच होते. आणि दोन सदस्य दिल्लीहून दूर राहत असल्याने आणि त्यांची प्रकृती बरी राहत नसल्याकारणाने तेही घटनेच्या कामात उपस्थित राहत नसत. अश्या रितीने शेवटी असे झाले की संपूर्ण भार एकट्या डॉ. बाबासाहेबांवरच येऊन पडला. आणि ते कार्य आपल्या सखोल ज्ञानाने, परिश्रमाने, राष्ट्रप्रेरनेने, शारीरिक अवस्थेची जराही चिंता न करता, पावाचा अर्धा तुकडा खाऊन अर्धवट उपाशी राहून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारतीय संविधानाची निर्मिती केली. हा इतिहास बहुतेक जणांना ठाऊकच नाही.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 पासून सतत 4 वर्ष 1 महिना 26 दिवस बौद्धीक कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले. त्या बील मध्ये वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे 7 घटक होते. म्हणजे हिंदू कोड बिल मध्ये स्त्रियांना संपत्तीत समान वाटा, एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधीची तरतूद केली होती.
ते कोड बिल 24 फेब्रुवारी 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत मांडले होते. परंतु डॉ. राजेंद्रप्रसाद, शंकराचार्य, रामानंद सरस्वती, स्वामी ताडपत्री आणि डॉ. सितारमय्या या पाच नेत्यांनी हिंदू कोड बिल नाकारले. 27 सप्टेंबर 1951 साली स्वातंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातुन महिलांच्या हक्काचं हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदावर लाथ मारली आणि राजीनामा दिला. बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल जर तेव्हाच मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता नष्ट झाली असती. पण दुर्दैव या भारताचे जर हे विधेयक पास केले असते तर हा भारत देश जगात महासत्ता म्हणून राहिला असता. बाबासाहेबांनी भारतातील महिलांवर जे उपकार कर्ज केले आहे त्याचे व्याज मरेपर्यंत न फिटणारे आहे.

12 ऑगस्ट 2018 रोजी दिल्ली जंतरमंतर येथे पोलिसांच्या नजरेसमोर भारतातीय राज्यघटना जाळली गेली आणि घटनाकाराला शिवीगाळ करून त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. “संविधान मुर्दाबाद, मनुस्मृती जिंदाबाद ‘ संविधान मुर्दाबाद, मनुस्मृती जिंदाबाद” अश्या घोषणा देत त्यांनी वाईट कृत्य केले.
भारतीय संविधान जळणार्या देशद्रोही मूर्खांना मी सांगू इच्छिते ‘नुसतं संविधान जाळून चालणार नाही संविधानसोबत आम्हालाही जाळावे लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला जाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’.

होती गुलामी गळ्याला दोरी, राष्ट्रगीत म्हणाया चोरी
साक्ष पुरावा देईल सारी, ती 26 जानेवारी..
कशा तूफानी माझ्या भिमानी, किनारी लावली नांव
घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भिमाचं नाव!!

प्रजासत्ताक दिन चिरायू हो 🇮🇳

जय भीम. 💙

प्रतिक्षा भवरे

लेखिका स्वतंत्र स्तंभलेखिका आहेत.

4 Comments

  1. खूप छान पोस्ट आहे…
    सध्याची परिस्थिती सांगणं आणि आपले विचार मांडण खूप गरजेचं आहे.
    तुम्ही अजून विषयावर लिखाण करू शकता..
    विषय ट्विटर ला dm करतो..

  2. Thank you for the efforts and sharing this piece of knowledge.
    We Ambedkarites would love to lead our masses by enlightening them with the Real Thoughts Of Babasaheb Ambedkar. Jai hind🇮🇳

  3. तुम्ही खूप समजुद्दर पणे समजावून सांगितले आहे ma’am i truly agree with ur thought’s.
    सप्रेम “जय भीम”

Leave a Reply

Your email address will not be published.


*