सनातनी/पुरोगामी/मार्क्सवादी ब्राह्मण सवर्ण बुद्धाचा द्वेष का करतात?

राहुल पगारे

बाबासाहेबांची चॉईस काही सहजच नव्हती.काही तरी खास आहे त्या बुद्धात जो आजही सवर्ण ब्राह्मणांच्या, भटाळलेल्या बहुजनांच्या द्वेषाचं कारण बनून गेला. बुद्ध प्रत्यक्ष हयात असताना पण त्याला जीवे मारण्याचा, त्याचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न झाला. बुद्धाची भाषा त्वेषाची, द्वेषाची, क्रोध, युद्धाची, सुडाची नव्हतीच कधी ती कोणाची असू नये हीच त्याची शिकवण. पण तरीही तो ब्राह्मणवाद्यात द्वेषाचं कारण बनला. काय कारण असावं हे प्रश्न भिडत राहतात नेहमी. बुद्धाच्या काळात समुहाच्या जाती असल्या तरी जातीची विषवल्ली जातीसंस्था विकसित झाली नव्हती. कारण तोपर्यंत तरी ब्राह्मणांना इथे समाजव्यवस्थेत वर्चस्व निर्माण करता आलेलं नव्हतं. हे वर्चस्व निर्माण व्हावं म्हणून ब्राह्मण धडपडत होता. म्हणुन जातीअंत, जाती विध्वंस ही त्याची त्या बुद्धाची मुख्य चळवळ नव्हती. पण उन्मादी विचार, कट्टरतावाद, मुलतत्ववाद, वर्चस्ववाद, साम्राज्यवाद, अंधश्रद्धा, दैववाद, हुकुमशाही, दडपशाही, या सगळ्यांच्या विरोधात तो लढत होता. हीच ती विषवल्ली आहे जी जातवर्णवर्गलिंग भेदातून सामाजिक विषमता निर्माण करते. म्हणुन बुद्धाची मुख्य चळवळ ही जातीअंत, जाती विध्वसांची नसली तरी कोणत्याही सामाजिक विषमतेला, वर्णवर्चस्ववादाच्या विषमते विरूद्ध लढणारी होती. म्हणुन बुद्ध प्रेरक ठरतो.

क्रांतीच्या नावाखाली रशिया, चीन, व्हिएतनाम मधे रक्तात माती भिजवली तशी क्रांती तर बुद्धाला बिलकुल अपेक्षित नव्हती. दुष्ट प्रवृत्तीच्या नावाखाली रामाला रावणाला, कृष्णाला कंसाला मारावं लागलं तसं बुद्धाला अंगुलीमालला मारावं लागलं नाही. लोकशाही व वृत्तपत्र स्वातंत्र्याची मागणी केली म्हणून १९८९ मधे विद्यार्थ्यांना रणगाड्याखाली कम्युनिस्ट चीन सरकारने चिरडले होते. बाबासाहेबांनी म्हणून कार्ल मार्क्स की बुद्धा ? असा पर्याय दिला होता. कारण बुद्ध प्रेरक आहे. समतावाद, लोकशाहीला पुरक आहे. म्हणुन बुद्ध द्वेषाचं कारण ठरला. हा द्वेष फक्त बुद्धापर्यतच मर्यादित नव्हता तर बुद्धाने त्रिशील सांगितले म्हणून ब्राह्मणांनी तीन अंक अशुभ ठरवलं, आजही बरीच लोकं तीन तिघाडा काम बिघाडा म्हणून तिघं सोबत जात नाही कारण ते अशुभ ठरवलं गेलं. श्रमण केशवपन मुंडण करत म्हणून ब्राह्मणांनी मुंडण केलेल्या व्यक्तीला सकाळी बघणं म्हणजे अशुभ ठरवलं. पांढरा रंग शीलाचं प्रतिक मानलं गेलं तर ब्राह्मणांनी इकडे ते विधवा स्रियासाठीच बंधनकारक केलं, बोधी वृक्ष, पिंपळाच्या झाडाला पर्याय म्हणून वडाची महत्ती सांगत वटसावित्रीची कथानक रचलं, इतकच नाही तर पिंपळावर भुतं असतात असलं थोतांड रचलं गेलं. खेडेगावात आजही तुम्हाला हे ऐकायला भेटेल.
ब्राह्मण म्हणजे ज्यांच्याकडे “प्रज्ञा व शील” विकसित झाले ही व्याख्या करुन ब्राह्मणांच्या जन्मजात, वर्णश्रेष्टत्वाच्या अहंकाराला आव्हान द्यायला लावले सर्वसामान्य लोकांना ब्रामणी वंशवादाविरूद्ध. बुद्धाचं तत्वज्ञान संस्कृत मधल्या भांषातराला पण बुद्धाने विरोध करुन त्याला अर्धमागधी, पाली लोकभाषेतच ठेवलं. शिक्षणाचं सामाजिकीकरन, सार्वत्रिकीकरण करत नालंदा तक्षशिला, विक्रमशीला सारखे विद्यापीठ उभारुन ज्ञान निर्मितीत भर घातली असताना आठव्या, नवव्या शतकात आदि शंकाराचार्य राजपूतांना घेऊन बौद्ध भिक्खू जिथंं दिसेल तिथे शिरच्छेद करतात. विद्यापीठ विहार जाळत सुटतात.

ब्राह्मणांत हा बुद्धाप्रतिचा द्वेष भयंकर होता. आणि आजही तो कमी नाही. मार्क्सवादी पण करतात. कारण बुद्ध facism च्या विरोधात आहे. बुद्ध एक democratic institution आहे. आणि बुद्ध वर्णवर्गवर्चस्ववादाच्या विरोधात आहे. ब्राह्मण सवर्णांचा व त्यांनी भटाळुन सोडलेल्यांचा मग तो सनातनी असो की लिबरल पुरोगामी जितका बुद्धाला विरोध करतील तितकं बुद्धाचं महत्व अधोरेखित होत राहील. Right wings, left wings सनातनी व कम्युनिस्ट, फॅसिस्ट प्रवृत्ति मिळुन बुद्धाचा द्वेष करत असतील तर निश्चितच बुद्धात काही खास आहे. आणि म्हणून आम्ही बुद्धाला सोडत नसतो.

राहुल पगारे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक – कार्यकर्ते आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*