स्वरा भास्कर सारख्या पुरोगाम्यांचे ब्राह्मणवादाला खतपाणी आणि बहुजन स्त्रीची जागा बळकावण्याचे प्रयत्न

दिपाली साळवे

स्वरा भास्कर ने हिंदू धर्माच्या रूढी-परंपरा द्वारे केलेल्या गृह प्रवेशाचे सार्वजनिक प्रदर्शन बघितले. त्यामध्ये जात, वर्ग, वर्ण आणि लिंगधारीत उतरंडीत पद्धतशीर जपलेली शोषणाची समाज व्यवस्था सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण पुजाऱ्यांकडून धार्मिक विधी करण्यात आला होता. या धार्मिक प्रदर्शनामध्ये वाईट असे काहीच नाही कारण हिंदू धर्मातील रूढी, प्रथा-परंपरा यांना खत पाणी घालून स्वरा सारख्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या ब्राह्मणवादाने पछाडलेल्या लॉबीमुळे आजपर्यंत त्यांच्याच स्वार्थासाठी हे जिवंत ठेवले आहे. परिणामी उदाहरणादाखल स्वरा भास्कर आणि ब्राह्मणवादी लॉबी आपल्या धार्मिक प्रथा परंपरा जिवंत ठेवून ब्राह्मणवादाला मोठे करण्याचे काम न थकता करत असतात. यामध्ये फक्त स्वरा भास्कर एकटीच नसून ज्यांनी तथाकथित लिबरल होण्याची मुखवटे घातले आहे ते ही समाविष्ट आहेत. जसे की रवीश कुमार, कन्हैया कुमार, अरुंधती रॉय, कुणाल कामरा, अनुभव सिन्हा, रीचा चढ्ढा अशी नावांची भलीमोठी यादी तयार होईल. ज्यांनी वंचित समाजाचे शोषणही केले आणि आपल्या मनाप्रमाणे आमच्यावर चित्रपट काढले ज्यामध्ये सगळे दिग्दर्शका पासून ते अभिनेत्या पर्यंत सर्व सवर्ण, आमच्यावर सेमिनार, कॉन्फरनस, ग्रुप डिस्कशन आणि व्याख्यानमालेच्या नावाखाली सवर्ण प्रमुख अतिथी द्वारा सवर्ण विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचे काम केले. आमच्या विद्यार्थांच्या अत्याचारांवर, हत्यांवर तुम्ही स्वतःला मोठे करून घेतले. जातीवादाच्या गंभीर मुद्द्यावर सवर्ण लेखका द्वारे पुस्तके लिहिली गेली. आमच्यावर सवर्णांकडून कॉमेडीच्या नावाखाली “सार्वजनिक जातीभेद” केला गेला, जो तो ही हसत खेळत तसेच आमच्या मुद्द्यावर न्यूजरूम मध्ये चर्चा ही करण्यात आली त्यातही फक्त सवर्णाची भरती, सवर्ण पॅनल घेऊन तुम्ही खुलेपणे जातीभेद करत होतात.. हे सगळे करून ही तुम्ही बहुजन महिलेला कोणतेही प्रतिनिधित्व न देता कोणत्या आजादीच्या गप्पा मारता हा प्रश्न या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा हायलाईट करत आहोत.
त्यामुळे हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत बसणे मला योग्य वाटत नाही, तुमच्या ह्या ब्राह्मणवादी षडयंत्रावर उघडपणे बोलके होण्याचे आणि एक बहुजन महिला म्हणून माझा यावर काय politically correct तसेच clear स्टॅन्ड पॉईंट काय आहे हे स्पष्ट करणे मला जास्त गरजेचे वाटते. जेणेकरून या देशातली तरुण पिढी तुमच्या तथाकथित, झुट्या, बेगडी आणि romanticize करून ठेवलेल्या आजादीच्या नाऱ्यांना बळी न पडता त्यांच्या डोळ्यांवर पडलेल्या ब्राह्मणांच्या फेक क्रांतीचा पडदा उघडून स्वघोषित लिबरलांचा ब्राह्मणवादी चेहरा दाखवणे या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचे वाटते.

तर स्वरा भास्कर, तुझा बेगड्या क्रांतीचा दृष्टिकोन आणि पोकळ आजादीच्या घोषणा या ज्या फक्त बहुजन समाजापुरत्याच तू मर्यादित ठेवल्यास, त्याच्यासाठी तू तुझा स्टेज वेगळा मांड आणि प्रेक्षक म्हणून स्वजातीतील लोकांना समोर उभे कर आणि जी क्रांती करायची आहे ती कर. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही कारण तो मंच तुझा असणार आहे, तिथे तुझे स्वतंत्र असणार आहे जे भारतीय संविधानाने तुला दिले आहेत. आम्ही तुझ्या धार्मिक भावनांवर टीका करणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे तुला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. ज्या पद्धतीने तू तुझा धार्मिक स्टॅन्ड घेऊन ब्राह्मणवादाला जोपासण्याचे काम नेटाने करत आहेस त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही कारण आम्हाला माहिती आहे, की भारतातील सवर्ण वामपंथींनी मार्क्सवादाचा वापर करून वर्गसंघर्षच्या नावाखाली जातिव्यवस्थेला मजबूत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे तू तुझ्या रंगमंचावर काय गोंधळ घालायचा तो घाल, परंतु बहुजन स्त्रीची जागा घेण्याचे जे प्रयत्न तू करत आहेस ते करणे बंद कर. कारण एकीकडे तू कास्ट मॅटर हा इंटरनल मॅटर म्हणतेस आणि दुसरीकडे तू ब्राह्मणवाद्याच्या धार्मिक कर्मकांडाला खुल्याप्रकारे स्वीकारतेस. अशा द्वितोंडी भूमिका घेण्याचे तुझे हे काम आम्हाला न कळण्याइतके आम्ही अडाणी आता तरी नसतोय.

आता मागच्या काही दिवसांची जातीवादी घटना घेऊया. हाथरस मध्ये जातीवादी क्रूर घटना घडली. सर्वप्रथम बहुजन समाज रस्त्यावर उतरला तेव्हा तू गायब होतीस. कदाचित संधीच्या शोधात होतीस आणि ती संधी ही तुला मिळाली. पीडित बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीमध्ये एकत्र आलेल्या बहुजन समुदायाला तू समर्थन देण्याच्या नावाखाली बहुजन युवा नेता चंद्रशेखर याच्या बाजूला उभी राहून जो चालबाजीचा खेळ खेळलास व बहुजन स्त्रीचा अधिकार हिरावून घेतलास तो यापुढे होता कामा नये. कारण ती जागा माझ्या बहुजन महिलेची आहे आणि जर प्रश्न आमचा असेल, शोषण आमचे होत असेल, मंच आमचा असेल आणि माईक ही आमचाच असेल तर त्या शोषणाबद्दल आवाज उठवण्याचा हक्क पण आमचाच आहे. परंतु ती जागा ही तू बळकावली जसे वर्षानुवर्ष सवर्णांनी तथाकथित मेरीटच्या नावाखाली वंचितांचे हक्क बळकावले. त्यामुळे तुझ्या जागी माझी बहुजन महिला असती तर मला जास्त आनंद झाला असता. कारण ती या “आम्ही भारताचे लोक” म्हणणाऱ्या देशात सगळ्यात खालच्या स्तरावर आहे. खरे तर तुला त्या जागेवर बघून मला खरंच मनस्वी चीड आली. त्यामुळे यापुढे लक्षात ठेव की बहुजन आंदोलनाचे नेतृत्व बहुजन महिलेनेच करावे असे मला वाटते. कारण शोषितांच्या संघर्षाचे नेतृत्व माझ्या बहुजन आया-बहिणीद्वारे झाले पाहिजे. तुझ्यासारख्या ब्राह्मण्यवादाने पोसलेल्या स्त्री द्वारे नाही. त्यामुळे तुम्हाला (सवर्ण) आता स्टेजच्याखाली राहूनच आमचे मानवतावादी विचार आणि तुमच्या शोषक पूर्वजांचा कपटीपणा तसेच त्यांनी लिहिलेला खोटा इतिहास ऐकण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आमचं नेतृत्व स्वीकारून आमच्या साथीला बळ देण्याचा मोठेपणा आतातरी अंगी यायला हवा ही माफक अपेक्षा मी करते.

त्यामुळे अगोदर सवर्ण जातीतील पुरुष वर्चस्ववादी मानसिकतेने सडलेल्या सवर्ण पुरुषांना आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक सत्तेच्या वाहक सवर्ण स्त्रियांना मानसिक गुलामीतून मुक्त कर आणि मानसिक गुलामगिरीतून स्वतंत्र होणे म्हणजे नक्की काय हे कळत नसेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी “मुक्ती कोण पथे” या मधून जी मानसिक स्वातंत्र्याची व्याख्या करताना म्हटले आहे की “मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वतंत्र आहे ज्याचे मन स्वातंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे ज्याचे मन स्वातंत्र नाही तो कैदी नसला तरी तुरुंगात आहे ज्याचे मन स्वातंत्र नाही तो जिवंत असूनही मेलेला आहे मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे” याचे सखोल वाचन कर. जर तुला तुला स्वतंत्र पाहिजे असेल तर सर्वप्रथम धार्मिक गुलामीतून स्वतंत्र हो त्या शिवाय तुझ्या जीवनात कोणतीच क्रांती होणार नाही एवढे मी स्पष्ट सांगू शकते.

जिला पीडा काय आहे हे माहिती नाही व आपल्या सर्व जातीतील सवर्ण महिलांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून मानवता म्हणजे काय हे शिकवू शकत नाही तिला आमच्या मंचावर येऊन आम्हाला तिच्या विशेषाधिकार घेऊन आलेल्या भाषणबाजीची गरज नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही सवर्ण ब्राह्मणवादाचे पोषक आहात जे ब्राह्मणवादाला पोसतात. असे नाही की सवर्ण महिलांना माहिती नाही हिंदू धर्मातील ग्रंथामध्ये जसे की मनुस्मृतीत महिलांविषयी काय लिहिले आहे व त्यांना कोणते अधिकार देण्यात आले आहेत आणि कोणते हक्क नाकारण्यात आले आहेत. त्यांना चांगलेच माहिती आहे कारण त्या शिक्षित आहेत. तरीही त्या ब्राह्मणवादी/मनुवादी क्रूर रूढी-परंपरांवर फक्त विश्वासच ठेवत नाही तर पुढच्या पिढीला ही तेच मनुचे संस्कार देण्याचे काम करतात. त्याचे कारण असे की त्यांना चांगलेच माहिती आहे की जसं सवर्ण पुरुषांना मनूमुळे सर्वश्रेष्ठतेचे स्थान देण्यात आले आहे, तसेच सवर्ण बामणी महिलांनाही विशेषाधिकार मिळालेले आहे त्यामुळे जातीव्यवस्था नष्ट करून त्यांना हिंदू धर्माद्वारे मिळालेले विशेषाधिकार गमावून साधन संपत्तीचे वाटप करायचे नाही. तसे बघितले तर त्यांना (सवर्ण स्त्रियांना) एससी, एसटी, ओबीसी आणि पसमंदा मुस्लिम पुरुष/महिलांचे शोषण करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो असे दिसते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही इथले जे कास्ट पिरॅमिड आहे ते स्ट्रॉंगली मेन्टेन करत आहात. त्यामुळे तुझी ती खोटी आजादी आणि क्रांती तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. जोपर्यंत आमच्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे आणि Annihilation of Caste आहे तोपर्यंत तरी आम्हाला तुमच्या तथाकथित क्रांतिकारी विचारांची गरज नाही. म्हणून तुमची जी दुकाने आहेत ती दुसरीकडे मांडा. आमच्या स्पेस मध्ये येऊन जर आंबेडकरी तरुण पिढीला भडकविण्याचे काम केले आणि पितृसत्ताकतेच्या नावाखाली आमच्या पुरुषांचे अपराधीकरण करण्याचा प्रयत्न केला तर ज्याप्रमाणे औरंगाबाद मधील आंबेडकरी स्त्रिया राजस्थानमधील न्यायालयाच्या आवारातील मनूच्या पुतळ्याला काळे फासू शकतात त्याच स्त्रिया तुला आमच्या विचारपीठावरून सहज खालीसुद्धा खेचू शकतात एवढे लक्षात ठेव.

आणि हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारताची राज्यघटना जेव्हा हातात घेऊन आजादीच्या पोकळ घोषणा देतेस आणि त्यांच्या विचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतेस हा विरोधाभास पाहताना मात्र तुझ्यावर हसू येते. आम्ही तुझी गोची समजू शकतो, तुझ्यासाठी ब्राह्मणवादा विरोध करणे अवघड आहे. परंतु तुला जर खरंच बहुजन समाजाची काही मदत करायची असेल तर तू सर्व प्रथम स्वतःच्या घरापासून/समाजापासून सुरुवात करावी. कारण सगळ्या समस्याचे मूळ व जातीव्यवस्थेचे पाळेमुळे तुझ्या स्वजातीत आहे. जसे की तुझा तथाकथित स्त्रीवाद हा ब्राह्मणवादाला खतपाणी घालत आहे हे सर्वप्रथम तुलाच समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी तुला फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार वाचणे महत्त्वाचे आहे. त्यांचे विचार तुझ्या ज्ञानात मोलाची भर घालतील कारण ज्याला तू God have approved म्हणून धार्मिक कर्मकांड करतेस त्यातच मानसिक गुलामगिरी आहे आणि त्या मानसिक गुलामगिरीतून आजादी मिळवण्यासाठी तुला हिंदु धर्मग्रंथ नाकारून जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी तुझ्या सवर्ण समाजाला समता, बंधुता, स्वतंत्रता, न्याय या संविधानिक मूल्यांची शिकवण देत ते स्वखुशीने अंगिकरण्याचे शिकवावे लागेल.

याच संपूर्ण मानसिक गुलामगिरीतून मुक्त होतानाच्या, उलथापालथ होण्याच्या process ला ‘प्रबुद्ध होणे’ म्हणतात.

बघ, जमतंय का तुला…

दिपाली साळवे

लेखिका मुंबई विद्यापीठ येथे PhD scholar आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*