मानवतेचे बियाणे

डॉ सुनील अभिमान अवचार

मानवतेचे बियाणे

हे बियाणे बुद्धाने पेरले आहे

हे बियाणे संविधानाच्या कुशीत निर्भयपणे वाढले आहे

बहुपदरी विषमतेच्या जमिनीत शोषित-वंचितांसाठी न्याय व समतेची सावली उमलवली आहे

हे बियाणे आंदोलनाचा वारा प्यायलेले
जय भीम-जय बिरसा-जय सावित्री-जय फुले-जय पेरियार घोषणांमध्ये बहरलेले

स्वातंत्र्य-समता-बंधुता या सार्वत्रिक मूल्यांचा पुरस्कार करणारे
मझहाब नही सिखाता आपस मे बैर न रखना अशी शिकवण देणारे

घृणा-हिंसा-तिरस्कार यांना तिलांजली देऊन प्रेम व करुणेने समताधिष्टीत समाज निर्मिणारे आणि हा विविधतेचा देश एकसंध बांधून लोकशाही-प्रजासत्ताक देश घडवण्याचं स्वप्न पाहणारं हे बियाणंन्याय्य समाजरचना करण्यासाठी आता कुठे रुजले आहे

-आणि तुम्ही या बियाण्याला देशद्रोही म्हणता?

हे बियाणे कुजवण्याचा गुन्हा करू नका
हे बियाणे तुमचे मनसुबे नेस्तनाबूत करेल

डॉ सुनील अभिमान अवचार

लेखक हे समकालीन कवी- चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’, हे त्यांचे महत्वाचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.’Our WORLD is Not for SALE ‘आणि ‘We, the Rejected People of India’ हे त्यांच्या मराठी कवितेचे इंग्रजीत अनुवाद झालेले काव्यसंग्रह आहेत. अवचार यांचे साहित्य जात, लिंग, वर्ग भेदाच्या मुक्तीदायी अवकाशासाठी उभे राहणारे आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*