मिलिंद हे नाव का?

ह्या कॉलेज ला मिलिंद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक बॅक्ट्रीया चा ग्रीक राजा होता . त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होती. त्याला असे वाटे कि, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेच सापडावयाचे नाहीत. आपल्या बुद्धिमत्तेचा मिलिंद ला गर्व चढला होता. तो सर्वांना वादविवादाने आव्हान देत असे. त्याने जगाला आव्हान दिले. त्याला एकदा वाटले कि आपण एखाद्या बौद्धभिक्खू बरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करावयास कोणीही तयार झाला नाही. तसं मिलिंद हा काही तत्वज्ञानी नव्हता किंवा गाढा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहित होते पण अशा मिलिंद बरोबर बुद्धिवाद करण्यास कोणीही तयार होईना. ह्याची बौद्धांना लाज वाटली आणि वाईटही वाटले. नंतर महान प्रयासाने त्यांनी नागसेन भिक्खूला तयार केले. मिलिंद चे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे असा नागसेनाने निश्चय केला. मग त्यात यश येईल किंवा अपयश.

मिलिंद महाविद्यायतील फलक

नागसेन हा ब्राम्हण होता. त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी त्याने आपल्या आई-बापाचे घर सोडले होते. त्याने विद्येच्या, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले. तो अत्यंत विद्वान होता. नागसेनाने भिक्खुचा आग्रह मान्य केला, नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद झाला. त्यांचा वादविवाद कैक दिवस चालू होता. ह्या वादविवादाचे एक पुस्तक तयार झाले. त्या पुस्तकाला पाली भाषेत “मिलिंद पन्हो” असे नाव आहे. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर “मिलिंद प्रश्न” असे आहे. या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी इच्छा आहे. शिक्षकांच्या अंगी व विद्यार्थ्यांच्या अंगी काय गुण असावेत हे त्यात सांगितले आहे म्हणून मी या कॉलेज ला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले व परिसराला नागसेनवन हे नाव दिले.
वादविवादात मिलिंद हरला, त्याचा पराजय झाला. तो बुद्धधर्मी झाला.

पण मिलिंद हरला व बुद्ध धर्मी झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही तर मिलिंद हा मला त्याच्या intellectual. honesty. बद्दल प्रिय वाटतो. त्याचा हा आदर्श सर्वांनी नेहमी डोळ्यांसमोर ठेवावा म्हणून मी हे नाव दिलेले आहे. हे आदर्शभूत असेच आहे असे माझे मत आहे. उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद व उत्तम शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेत. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशांची देणगी दिली म्हणून त्याचे नाव शिक्षण संस्थेला देणे हे अनुचित होय. मी ह्या संस्थेसाठी पुष्कळ नुकसान सोसले आहे, पण कोण्या व्यक्तीचे नाव दिले नाही. तसे मला सुद्धा आदर्श नाव आहे पण मला मिलिंद चा आदर्श आपल्या समोर ठेवावयाचा आहे”
मिलिंद महाविद्यालय एक संस्कारकेंद्र आहे, यामधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत होऊन बाहेर पडला पाहिजे.

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दिनांक – 12 डिसेंबर 1955

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*