आंबेडकरी चळवळीचा महाकवी वामनदादा कर्डक

विकास परसराम मेश्राम

वामनदादा कर्डक आंबेकरी गीताचे महामेरू ,गहण तत्वज्ञान साध्या शब्दात सांगणारे, अवघे जीवन समाजासाठी वाहीलेले वामनदादा कर्डक…

आंबेडकरी विचार जनमानसात रुजविणारे अनेक आंबेडकरी गीतकार होऊन गेले. बाबासाहेबांना आपला ऊर्जास्त्रोत मानून पायाला भिंगरी बांधून खेड्यापाड्यापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहचविणारे अनेक असंख्य ज्ञात व अज्ञात कलावंतांचे कार्य मोठे आहे. बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्यातील विविध स्तरातील महान व प्रतिभावान कलावंतांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकशाहिर वामनदादा कर्डक हे आंबेडकरी गीतकार आणि लोककलावंत म्हणून महत्त्वाचे नाव समजले जाते. वामनदादा नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. वामनदादानी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.लोकशाहीर वामनदादांनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत समाज जागृतीचे कार्य करीत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला.

वामनदादांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ साली नाशिक जिल्ह्यातील ता. सिन्नर मधील देशपंडी या छोट्याशा खेड्यात झाला. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. त्यांच्या घरी १८ एकर शेती होती. धान्य घरात यायचे तरीही हंगाम संपला की आईने डोंगरात जाऊन लाकडे गोळा करून मोळी बांधून ते जळतण सिन्नर बाजारात विकायचे. वडील टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकायचे व हेडीचा धंदा करायचे. सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायची. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी, कधी भाकरीच खावी लागायची.

वामनदादांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिलमध्ये नोकरी, इत्यादी कामे केली. त्यांना वाचनाचा छंद होता तसेच त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.

स्त्रोत – इंटरनेट

वयाच्या १९-२०व्या वर्षी त्यांचे लग्न अनुसया नावाच्या मुलीशी झाले. पुढे त्यांच्या कुटुंबात मीरा नावाच्या मुलीने जन्म घेतला. वामनदादांचे जीवन सुखात गेले नाही. बायको त्यांना सोडून गेली आणी पुढे आजारपणात मीराचेही निधन झाले. हा त्यांचा जीवनाला फार मोठा धक्का होता, ते मीराचे दुःख कधीही विसरू शकले नाहीत.

मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आईसोबत पोटाची खळजी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचा धंदा केला. मिळेत ते काम केले. नंतर त्यांना टाटा कंपनीत नोकरी मिळाली. शिवडीच्या बीडीडी चाळीत राहत असतांना ते समता सैनिक दलात सामील झाले. इथपर्यंत वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता.

एकदा त्यांच्या चाळीमधीस एका माणसाने वामनदादांना पत्र वाचायला सांगितले. दादांना पत्र वाचता लिहिता येत नव्हते. याचे त्यांना खूप वाईट वाटले. शिक्षण नसल्यामुळे आपण लिहू-वाचू शकत नाही हे त्यांना अवघड वाटू लागले व ते रडू लागले. आणि ते देहलवी नावाच्या मास्तरांकडून बाराखडी, मुळाक्षरे शिकली. जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळू-हळू त्यांचे लेखन वाचन वाढू लागले. सोबतच ते विविध खेळही खेळायचे व व्यायामही करायचे.त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली होती. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे १९४३ साली वामनदादा यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिले होते.वामनदादा कर्डक यांचे मराठी व हिंदी वाचन बरेच पुढे गेले होते. त्यांना चित्रपट कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले. पण त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. ते कारदार स्टुडिओ, रणजीत स्टुडिओ यांमध्येही कामाला जायचे. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणीच्या बागेत तासनतास बसायचे.

असेच १९४३ मध्ये राणीच्या बागेत बसले असता वामनदादा कर्डक यांनी पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत करायचे सुचले व ते त्यांनी ३ मे १९४३ रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले. लोकांनी प्रशंसा केली, टाळ्या वाजवल्या आणि वामन दादा कर्डक कवी झाले. त्यानंतर २००४ पर्यंत वामन दादांनी गीतलेखनाचा व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांची प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारावर गीतरचना आहे. त्यांनी काही चित्रपट गीतेही लिहिलेली आहेत. त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी बाबासाहेबांच्या भाषणांच्या दरम्यान कवितांचे गायन केले.वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३,‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६, ‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७, ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६ ही त्यांची ग्रंथसंपदा
सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चित्रपट – सांगत्ये ऐका)
चल गं हरणे तुरू तुरू ,ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा, तुझ्याकडे बघून हसतोय गं, काही तरी घोटाळा दिसतोय गं (संगीत- मधुकर पाठक; स्वर- श्रावण यशवंते)ही चित्रपट गीते
वामन दादा अनेक व सन्मान मिळालेले पुरस्कार मिळाले
दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप,महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार.
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व ,महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व,औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७),प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७),मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१), प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन,साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्‍न’ ही गौरववृत्ती.’युगांतर प्रतिष्ठान’तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७),
जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’
मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा ‘भीमस्मृती पुरस्कार’मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’ इ.स. १९९३ मध्ये, वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.

वामनदादा कर्डक हे आंबेडकरी गीतकार आणि लोककलावंत होते. त्यांची गीत लोकजीवनाच्या रोज जगण्याच्या बोलीभाषेतून उत्स्फूर्तपणे साकारणारी आहेत. अशा बोलीभाषेतून रचलेल्या आणि गायलेल्या गीतांमुळेच वामनदादा कर्डक हे गीतकार म्हणून जनमान्य ठरतात. शब्दांचा साधा पेहराव आणि गाण्याचा अकृत्रिम सरळ सुलभ साधेपणा हाच त्यांच्या गायनाचा अलंकार होता. आणि तो सर्वांना आवडत होता. थोडक्यात सांगायचे झाले तर वामनदादांची गाणी म्हणजे आंबेडकरी चळवळीची जिवंत वाटचाल आहे. ते आंबेडकरी सम्यक क्रांतीला प्रकाशमय करणारे तेजस्वी गीत आहे.वामनदादांनी ओळखले होते की, गाणं हे आंबेडकरी विचार जनमानसात पोहचवण्यासाठी प्रभावशाली शक्ती आहे. संपर्काचे परिणामकारक माध्यम आहे. म्हणून त्यांनी ह्या माध्यमांचा वापर तळागाळातील लोकांना जागृत करण्यासाठी केला. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या अभिव्यक्तीसाठी शब्द, सूर, आणि स्वर यांचा एखाद्या क्षेपणास्त्रासारखा वापर मृतवत पडलेल्यांना जागे करण्यासाठी, जागृत करण्यासाठी केला.

आपल्या गाण्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचार घराघरात पोहचवणाऱ्या लोकशाहिर वामनदादा कर्डक महान आंबेडकरी चळवळीतील महानायकांचा मृत्यू १५ मे २००४ ला निर्वाण झाले.

विकास परसराम मेश्राम

लेखक गोंदिया येथील रहिवासी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*